पाश्चात्य संस्कृतीतल्या चुकीच्या गोष्टीच नेमक्या भारताने उचलल्यात, अशी एक नेहमी ऐकू येणारी ओरड आहे. ती खरीही आहे काही अंशी. आपल्याकडे खरंच तिथल्या संस्कृतीतल्या काही गोष्टी सोयीस्करपणे उचलून त्यांचं स्वरूप खूप वेगळं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टींकडे आणि एकंदरीतच त्या ’संस्कृती’ कडे बघण्याचा भारतातल्या बहुतांश लोकांचा दृष्टिकोन हा काहीसा वक्रच असतो.
कालच व्हॅलेंटाईन डे होऊन गेला. या ’डे’ विषयी बोलताना अनेक जण “या’डे’पणा’ आहे’ असं म्हणतात, अनेक जण तो हॉटेलात जाऊन, भेटकार्ड देऊन, सिनेमा बघून साजराही करतात. आणि एक पंथ असं म्हणणा-यांचा असतो की प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कशाला हवा?... ते रोज आपल्या वागण्या बोलण्यातून व्यक्त झालं पाहिजे वगैरे वगैरे. आणि हाच नियम मग मदर्स डे, फादर्स डे, सिस्टर्स डे, ब्रदर्स डे सगळ्यांना लागतो.. ते सगळे ’डे’ सुद्धा चुकीचे किंवा अनावश्यक ठरतात.
काल माझ्या एका सहकर्मचा-यांशी सहज याविषयी बोलत होतो, तर त्यांचाही विचार वर मांडल्याप्रमाणेच दिसला; की हा दिवसच कशाला... इत्यादी. मला याबद्दल असं वाटतं की,
’... जसं गणपती समोर आपण रोजच हात जोडतो, तरीही संकष्टी चं महत्व वेगळं असतं, विठठलाचं नाव नेहमी मुखात असलं तरीही आषाढी - कार्तिकी ची ओढ आगळी असते, तसंच काहीसं या ’डे’ज बद्दल आहे...’
मी म्हटलंही त्यांना तसं. अर्थात, व्हॅलेंटाईन किंवा इतर कुठल्याही डे च्या नावाखाली जे गैरप्रकार आणि जी फालतूगिरी चालते, त्याचं मी मुळीच समर्थन करत नाही, किंबहुना त्याला माझा तीव्र विरोध आहे. एवढंच म्हणणं आहे, की या संस्कृतीतला जो चुकीचा भाग घेतलाय त्याला विरोध करणं ही एक गोष्ट झाली; पण त्या संस्कृतीला आपल्या परंपरेनुसार वळण देऊन जर त्यातील पटतील ते सण, दिवस, रुचतील तसे साजरे केले, तर हरकत का असावी!















