Saturday, September 28, 2013

तू तेरा देख

हातचं सोडून पळत्याच्या; काखेत कळसा गावाला वळसा; या आणि अशा अनेक म्हणी ऐकत आलोय. त्याचा अर्थ आजकाल माणसांच्या वागण्यातून पदोपदी उमगत राहतो. माणसं स्वत:चं सुख दुस-याशी तुलना करून मोजतात. स्वार्थी तर असतातच; परंतु दुस-याच्या आयुष्यात त्यांना जास्त रस असतो. आपण कोण आहोत, आपल्याकडे काय आहे, आपली स्वप्न काय आहेत, आपल्या आकांक्षा काय आहेत, या सगळ्यापेक्षा दुसरा काय करतो, त्याच्याकडे काय आहे, त्याच्याबाबतीत काय घडतंय, याचं चिंतन जास्त करतात. या चिंतनातून मग चढाओढ, असूया, द्वेश, मत्सर, गर्व आणि अशी निरनिराळी मूल्य माणसं अंगी बाणवत जातात.

का माणसं आत्मचिंतनात सुख शोधू शकत नाहीत? का दुस-याचं सुख हे आपल्या सुखाचं मापक असावं लागतं? संतांनी नेमकं हेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी किती कळलं, किती वळलं हे संतच जाणोत.

रस्त्यावरून, विशेषत: महामार्गावरून जाताना ट्रक्स लॉरीज च्या मागे जे साहित्य, जी सुवचनं लिहिलेली असतात त्यापैकी माझं आवडतं सुवचन नेमकं हेच सुचवतं.


‘ ‘तू तेरा देख’; ट्रक्स च्या मागे लिहीलेलं आढळणारं हे छोटंसं वाक्य सुखाचा फार मोठा मूलमंत्र देतं.’
- अ. ज. ओक